माझा देश



सौ.स्वरूपा कुलकर्णी


   जननी जन्मभुमिश्च स्वर्गादपी गिरीयसी।

   ह्याचा अर्थ माझी मातृभूमी स्वर्गाहूनही मला जास्त प्रिय आहे.प्रभू रामचंद्रांच्या तोंडी हे वाक्य रामायणात आलं होतं.हे किती थोर विचार आहेत हे सांगायलाच नको.कारण मातृभूमीचा सुपूत्र म्हणून जेंव्हा जगभर गौरव होतो तेंव्हाच कळतं की अभिमानाने वक्ष किती फुलून येतो.माझा देश- भारत देश हे सांगतांना कितीतरी अब्द अब्द मनात दाटून येतं.माझे अस्तित्व ज्या भूमीने निर्माण केले तिला वंदन केल्याशिवाय होत नाही.वंदे मातरम् हे गीत ऐकतांना अंगावर शहारे येतात.ए.आर.रहमानने ते किती ह्रदयातुन गायलंय! शत्रूचा फडशा पाडत असतांना अंगावर आलेली गोळी झेलून वीर जवान जेंव्हा त्याही स्थितीत 'वंदे मातरम्' म्हणतो तेंव्हा मातृभूमीसाठी चाललेल्या यज्ञात एक आहूती अर्पण होते.स्वातंत्र्ययज्ञात ७५ वर्षांपुर्वीही असेच अनेक वीर योद्धे लढता लढता मृत्युमुखी पडले.पण त्यांच्या अपार कष्टातून स्वातंत्र्याचा सुर्य उगवलाच.ही भूमी शत्रूंच्या जाळ्यातून मुक्त झाली.१५ ऑगस्ट १९४७ ला भारत भूमी स्वतंत्र झाली.परत एकदा मुक्तीचे वारे वाहू लागले.प्रत्येक भारतीय नागरीक स्वतंत्र झाला.भारतात लोकशाही राज्यपद्धती अस्तित्वात आली. व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार केला गेला.मातृभूमीचा गौरव करणारी गौरवगाथाच वीर हुतात्म्यांनी आपल्या रक्तानी,घामानी व अश्रुंनी लिहीली.ही मातृभूमी चंद्र सुर्य आकाशात आहेत तोपर्यंत राहील असे वचनच ते त्यातून लिहून गेले.

       हा माझा देश रामकृष्णांसारख्या वीरांचा,देवतांचा आहे. इतिहासात माझ्या देशाची मान उंचावणारे अगणीत वीर योद्धे रणसंग्रामात अजेय राहिले.त्यांच्या आहुत्यांनी मातृभूमीचा रणयज्ञ तृप्त होत आलाय.ही वत्सल मातृभूमी मुक्तीचा, स्वातंत्र्याचा, सहिष्णूतेचा पुरस्कार करते.तिच्या नदी पर्वत रांगातून अगणीत योद्ध्यांच्या, साधू संतांच्या अमर भूपाळ्या गुंजन करताहेत.स्वाभिमानाचे,मानवतेचे बाळकडूच ही भूमी देते.इथला माणूस नुसता दैववादी नाही तर पिरयत्नवादीही आहे.ही भूमी सुजलाम् सुफलाम् आहे.नाना रत्नांची खाण आहे.सृष्टीसौंदर्याने नटलेली आहे.हीच्या नखशिखान्त सौंदर्याने संपूर्ण जग तिच्याकडे अभिलाशेने बघते.परंतू तिच्यातील विरश्री व तेजस्वी नजरेने ते झूकते.ती जशी विरांची भूमी तशी कष्टकऱ्यांची भूमी.शेतकरी इथला राजा.ती बहुरंगी बहुढंगी कलांची, ज्ञान विज्ञानाची प्रयोगशाळाच आहे.इथल्या खेळाडूंना,कलाकारांना जागतिक स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार मिळत आले आहेत.इथल्या शास्त्रिय संगिताचा  दर्जा सर्वांनी वाखाणलेला आहे.अध्यात्मात भारत जगाच्या गुरूस्थानी आहे.निरनिराळ्या कला व ऐतिहासिक वारशांच्या बाबतीत भारत परिपूर्ण आहे.इथली संशोधने, उत्पादने जगाचे नेत्र दिपवतात.सण वार उत्सवात भारत सदा उत्सवी व आनंदी रूप धारण करतो.दारिद्र्य, सुविधांची कमतरता ,स्वार्थी राजकारण ही इथे लागलेली कीड आहे.परंतू, माननीय नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान यावर नक्कीच उपाय काढतिल हा भरोसा आहे.विद्यमान पंतप्रधानांनी अनेक चांगले उपक्रम राबवले आहेत आणि ते जगाच्या नजरा खिळवून टाकत आहे.हीच नव्या युगाची नांदी आहे.परत एकदा विश्व भारत मातेच्या चरणी नतमस्तक होईल हीच अभिलाषा आहे.

जय हिंद।जय भारत।।

Comments

Popular posts from this blog

घरचे लग्न