#प्रवास
#बंगळूरू
#आठवणी
लेख क्र १
-सौ.स्वरूपा कुलकर्णी
२०१३ मध्ये आमचं लग्नं झाल्यावर आम्ही फिरायला म्हणून बंँगलोर(आताचं बंगळूरू) उटी,म्हैसूर अशा पर्यटकांना प्रिय असणाऱ्या स्थळांना भेट द्यायला गेलो.मुळातच मला प्रवास आवडतो,नविन ठिकाणचे अनुभव,तिथली माणसं,तिथले व्हाईब्स सगळं सगळं मनात साठवायला प्रचंड आवडतं.पुन्हा नंतर त्या आठवणी आल्या की मन परत ताजंतवानं होऊन जातं. जणू टाईम मशीनसारखं परत त्या काळात जाऊन तो अनुभव समोर येतो.
तर आम्ही ट्रॅव्हल्सने पुण्याला व पुण्याहून विमानाने बँगलोरला पोहोचलो.विमानात दुसऱ्यांदा बसण्याचा योग होता.विमान प्रवास सहज व आरामदायक पार पडला.तो रोमांचक होता.पुणे ते बॅंगलोर पटकन आलो असं वाटत राहिलं..मग बँगलोरच्या अतिशय आधुनिक नी लांबलचक एअर पोर्टवर पोहोचलो. तिथे पोहचल्यावर खूप भारी वाटलं.तिथला क्राऊड खरंच मस्तं होता. तिथून एका हॉटेलवर रूम घेऊन फ्रेश झालो. तिथे सुबोधच्या(नवरा) जुने कस्टमर असलेल्या श्री.सत्यनारायण सरांच्या मुलीचे शाही लग्नाचे निमंत्रण स्विकारलेले असल्याने तिकडेही २ दिवस जाणे झाले.कर्नाटकी पद्धतीचं अतिशय घरंदाज,सात्विक असे लग्नं पहायला मिळाले.लग्न एकुलत्या एक मुलीचं असल्यामुळे दिमाखदार व त्यांच्या प्रतिष्ठेला साजेसच पार पडले.पण यात कुठेही चमचमाट किंवा ओव्हर शो नव्हता.हे लग्नं हिंदू रितीरीवाजाप्रमाणे साग्रसंगित पार पडलं. दक्षिणी परंपरागत वाद्य,जेवणात अनेक सुग्रास पदार्थांची रेलचेल यामुळे मन व तन दोन्ही तृप्त झालं. सरांचं आदरतिथ्य २ दिवस पुरेपूर अनुभवून आम्ही बॅंगलोर दर्शन करण्यासाठी बाहेर पडलो. कारमधून फिरतांना बॅंगलोर किती आधुनिक शहर बनत चाललंय हे अनुभवत होतो.तिथली स्वच्छता,सुंदर रस्ते, अप्रतिम लेन,दोन्ही बाजूला भरपूर झाडं यामुळे हे शहर फार फार आवडलं.सुबोधच्या विविध कस्टमर कडे यानिमीत्ताने जाण्याचा योग आला नी तिथली घरं,प्रेमळ माणसं,तिथले आदरतिथ्य जवळून अनुभवता आले..खरी प्रेमात पडले ते येथिल घरांना पाहून कारण,समोरील बैठकीत भले मोठे देवघर व यात खूप देवी देवतांची गर्दी पण पूजा मात्र यथासांग..बघतच रहावं अशी ही देवघरं..तिथली माणसं तर त्या सुंदर दैवतांसारखीच प्रेमळ,साधी पण तितकीच श्रीमंत!मनाने नी पैशानेही ही माणसं श्रीमंत त्यामुळे कन्नडी फारशी येत नसूनही हिंदी इंग्रजी भाषेच्या आधाराने सुसंस्कृत व्यक्तिमत्वांचे मनसोक्त निरीक्षण करता आले. त्यांच्या भाषेतील व बोलण्यातील गोडवा, सहज आलेल्या अतिथींचे आतिथ्य व सुंदर सुंदर गिफ्टस देण्याची पद्धत किती सुरेख होती ते पुरेपूर अनुभवले.
हा प्रवास खूप काही देऊन गेला. बँगलोर पहातांना ही माणसं तिथली त्यांची बंगल्यांची कॉलनी मनात कायम घर करून राहिली.त्यावेळी फ्लॅट संस्कृती कदाचीत तेव्हडी फोफावलेली नसावी म्हणूनच सुंदर टुमदार बंगले येणाऱ्या अभ्यागतांचं स्वागत करायला सज्ज होते.आता माहीत नाही पण तेंव्हाचं बॅंगलोर फार सुसंस्कृत वाटलं..हे शहर सोडतांना अतिशय वाईट वाटलं हे खरंय..ते शाही लग्नं,सुसज्ज टुमदार बंगले, श्रीमंत माणसं, सगळं आजही मनाच्या कुपित बंद आहेत.. परत माहीत नाही बँगलोर कधी बोलवेल..
आमचा पुढिल प्रवास पुढच्या लेखात..
Comments
Post a Comment